विदर्भात दोन दिवस पावसाच्या सरी, हवेत गारठा वाढला

नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. किमान तापमानात घट झाल्याने नागपुरात कमालीचा गारठा वाढला आहे. विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचे असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तर महाराष्ट्रासह, उत्तर मराठवाड्यात गारठा कायम आहे. उर्वरित राज्यातही किमान तापमानाचा पारा काहीसा घसरला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या उत्तरेकडील भागात गारठा कायम असला तरी, नागपूर आणि परिसरात काल (मंगळवार) रात्रीपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील अनेक ठिकाणी पारा घसरला आहे. यामुळे नागपूरकरांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. ढगाळ वातावरण आणि पारा घासरल्याने अनेक भागात धुके सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. वाहनधारकांना वाहने चालविताना काळजी घ्यावी लागत आहे.

राज्यातील विविध मुख्य शहरांमध्ये कडाक्याची थंडी पडत असल्याचं चित्र आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद यासारख्या राज्यातील मुख्य शहरांमध्ये तापमानात कमालीची घसरण बघायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याचं आठवड्यात राज्यात हुडहूडी भरणारी थंडी जाणवली. उत्तर भारतात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढच्या तीन ते चार दिवसांत उत्तर-पश्चिम भारतात दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

Print Friendly, PDF & Email
Share