अखेर बाघनदी वरील पुजारीटोला व कालिसरार धरणाचे दरवाजे उघडले

◼️पुजारीटोला धरनाचे 6 दरवाजे तर कालीसरार धरणाचे 2 दरवाजे उघडले

देवरी 15 :- मध्यप्रदेश-छत्तीसगढ़ राज्यासह गोंदिया जिल्ह्यात सतत पावसाच्या हजेरीने गोंदिया जिल्हातुन बाघनदी फुगली असून वाघ नदी दुथळी भरून वाहत असल्याने अखेर पुजारीटोला 13 पैकी 6 दरवाजे 0.30 मीटर ने तर कालिसरार धरणाचे 4 पैकी 2 दरवाजे 0.30 मीटर उघडण्यात आले असून वाघ नदी काठील गावाला आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

◼️गोंदिया जिल्हात धान रोवणीच्या कामांना वेग:

यंदा मृग नक्षत्रात पावसाने शेतकर्‍यांना धोका दिला. त्यानंतर आद्र नक्षत्राची सुरुवात बर्‍यापैकी झाली. आता मागील चार दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस बरसत असल्याने धान लागवडीचा कामाला वेग आला आहे. आत्तापर्यंत 21 हजार हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड झाली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात धान लागवडीची काम पूर्णत्वास येणार असल्याचे शेतकरी सांगताहेत.

Paddy Planting

धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात 1 लाख 86 हजार 431 हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड केली जाणार आहे. यंदा पावसाळ्याची सुरुवात तशी रडखडतच झाली. जून महिन्यात पाठ फिरविलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या सुरूवातीपासूनच दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे. चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने रोवणीच्या कामाला वेग आला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खरिपासह अन्य पिकांना सुध्दा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. या पिकाला सर्वाधिक पाण्याची गरज असते. पण यंदा सुरूवातीपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम कसा होणार अशी चिंता शेतकर्‍यांना सतावित होती.

जिल्ह्यात केवळ 21 टक्के धान रोवणी आटोपली होती. त्यामुळे उर्वरित रोवणी कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र 5 जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले असून पावसाने जिल्ह्यात समाधानकारक हजेरी लावली आहे. सोमवारी जिल्हा प्रशासनाने गोंदिया तालुक्यात तर आज मंगळवारी गोरेगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद केली. त्यामुळे रोवणीच्या कामांना वेग आला असून शेत शिवारे लोकगीताने गुंजू लागली आहेत. आज मंगळवारी सकाळपासूनच ऊन सावलीचा खेळ सुरू होता त्यानंतर दुपारी तीन वाजेपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने मध्यम ते जोरदार हजेरी लावली. हवामान विभागाने सुध्दा पुढील तीन दिवस दमदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मागील तीन दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. गोरेगाव तालुक्यात 65.9 मिमी, गोंदिया 22.8 मिमी, आमगाव 35.8 मिमी, तिरोडा 55 मिमी, सालेकसा 44.5 मिमी, देवरी 31.4 मिमी, अर्जुनी मोर 25.5 मिमी व सडक अर्जुनी तालुक्यात 42.9 मिमी अशी एकूण 39 मिमी पावसाची नोंद मंगळवारी झाली.

Print Friendly, PDF & Email
Share