‘डेल्टा प्लस’बाबत सध्याच्या क्षणाला चिंता करण्याची गरज नाही- राजेश टोपे

मुंबई: देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत दिसत असतानाच कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’नं धुमाकूळ घातलेला दिसतोय. कोरोना विषाणूच्या या बदललेल्या स्वरुपामुळे देशाला कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं. यातच या संदर्भात आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

या क्षणाला डेल्टा प्लसच्या संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नसून आपण सध्या कोरोना नियमांचे पालन करून वागावे, एवढीच माझी सूचना राहिल, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. डेल्टा प्लसच्या गुणधर्माविषयी अद्यापही स्पष्टता आलेली नाही. वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात, परंतु आपल्या हाती असलेल्या सध्याच्या आकडेवारीच्या माहितीप्रमाणे निश्चतच जो एक मृत्यू झालेला आहे. तो केवळ डेल्टा प्लसमुळेच झाला, असं म्हणता येणार नाही, असंही टोपे यांनी म्हटलं.

दरम्यान, आरोग्य विभागाला अनेक लोक सहकार्य करताना दिसत नाहीत. त्यामुळे मी अशांना मुद्दाम आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपल्यासमोर अधिकाधिक टेस्टिंग आणि लसीकरणाचं आव्हानं आहे. त्यामुळं सर्वांना या टप्पातील निर्बंध लागू आहेत, आता सर्वांनी हे निर्बंध पाळले पाहिजेत. यासाठी प्रशासनानेही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असं मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना टोपे म्हणाले.

Print Friendly, PDF & Email
Share