देवरी तालुक्यातील बंधाऱ्याचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम !

◼️मुल्ला/वडेगांव येथील १०.५९ लक्ष निधीतून बांधलेल्या बंधाराचे निकृष्ट काम

◼️शेतकऱ्यांनी केली चौकशीची मागणी

देवरी :तालुक्यातील मुल्ला/ वडेगांव येथील बंधाऱ्यांची दुरुस्ती सुरू असुन हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाची होत आहे. या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी या बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली होती. मात्र हा बंधारा बांधत असताना बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले होते. त्यामुळे पाणी अडवल्यानंतर या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात गळती होऊन अडवलेले पाणी वाहून जाऊन बंधारा ओस पडला होता. यामुळे या बंधाऱ्यावर अवलंबून असलेली शेंकडों शेतकऱ्यांची शेतीतील पीक धोक्यात आले होते. यासाठी हा बंधारा दुरुस्त करण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून मुल्ला/ वडेगांव येथील शेतकऱ्यांनी केली होती.
त्यानंतर लघु पाटबंधारे विभाग गोंदिया, उपविभाग आमगाव या विभागाकडून जिल्हा वार्षिक योजना २०२२-२०२३ मधून १०,५९००० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आले. बंधारा दुरुस्तीचे काम सुरू असून या कामात निकृष्ट साहित्याचा वापर करून बांधकाम करण्यात आले. त्यात लो क्वालिटी सिमेंट चा वापर मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. उकडलेले गिट्टी, कमी दर्जाच्या लोहा, निकृष्ट रेती वापर करण्यात आला आहे. या बंधारा काम बांधकामात गुणवत्ता पूर्ण काम दिसून येत नाही आहे. हा निकृष्ट बंधारा दुरुस्ती बांधकाम पाहून शेतकरी संतापलेले आहेत. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

एकीकडे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत शासन पाण्यासाठी प्रचंड खर्च करत असताना, बंधाऱ्या लगतच्या गावांसाठी शेतकरी तसेच गुरे-ढोरे यांच्या पिण्यासाठी हा बंधारा उपयोगी पडणारा आहे. मात्र, बंधाऱ्याच्या निकृष्ट कामामुळे बंधाऱ्याची गुणवत्ता ढासळत चालली आहे. प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे लक्ष नसल्याने हा बंधारा यावर्षी कोरडा राहणार आहे. जिल्ह्यातील प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पाण्याबाबतच्या अशा दुर्लक्षामुळे जिल्ह्यात शासनाच्या योजना या कागदावरच आहेत की, काय हा प्रश्न निर्माण होत आहेत. किंबहुना अशा योजनांवर जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नसून, त्यामागे एक मोठी लॉबी काम करत आहे अशी चर्चा सुरू आहे.

पहिल्याच पावसात गुणवत्ता ढासळली:
देवरी तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून १०,५९००० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून ही या बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पहिल्याच पावसात या बंधाऱ्याची गुणवत्ता ढासळली आहे. हा बंधारा यावर्षीच्या पावसाळा काढणार की नाय यांची भीती शेतकऱ्यांना झाली आहे.

प्रशासनाने कडक कारवाई करावी:
शेतकऱ्यांना उपयुक्त असणारे विविध योजनेतून अनेक योजना राबवत असतात. अशाच योजनेतून हा बंधारा तयार केले होते. या बंधाऱ्याचे बांधकाम अगोदरपासून निकृष्ट दर्जाचे होते. मात्र प्रशासनाने पुन्हा बनाना दुरुस्ती करिता जिल्हा वार्षिक योजनेतून लाखो रुपये मंजूर करून ही हा बंधारा पुन्हा आज जैसे त्या स्थितीत निर्माण झाला आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी शेतकऱ्यांनी आर्त हाक दिली.

बंधारे बांधताना चित्रीकरणाची मागणी
देवरी तालुक्यात अनेक बंधारे निकृष्ट दर्जाचे असून एक – दोन वर्षांत त्यांना गळतीच लागते. ठेकेदार काँक्रिटचा बंधारा बांधताना अधिक नफ्यासाठी त्यामध्ये काँक्रिटमध्ये दगडाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वापरत असतात. त्याचप्रमाणे लोखंडाचे प्रमाण देखील कमी वापरत असतात आणि आदिवासी बहुल भाग असल्याने निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरले जात असल्याने बंधाऱ्यांना गळती चालू होते. त्यामुळे बंधारे बांधताना व्हीडियो शूटिंग (चित्रीकरण करून) करून मगच ठेकेदारांना बिल देण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

Share