१३ लोकांना ठार मारणारा नरभक्षी सीटी-१ वाघ अखेर वनविभागाच्या जाळ्यात

गोंदिया : गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांत धुमाकूळ घालणाऱ्या सीटी १ या नरभक्षी वाघामुळे वनविभागाची चांगलीच दमछाक उडाली होती. गेल्या ३ महिन्यांपासून ताडोबातील विशेष पथक या वाघाला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होतं. मात्र, यात यश येत नव्हतं. आता अखेर या वाघाला जेरबंद करण्यात यश आलं आहे.

भंडारा जिल्हासह गडचिरोली, वर्धा, नागपूर जिल्ह्यात तब्बल १३ लोकांची शिकार करण्याऱ्या नरभक्षी सीटी १ वाघाला गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथे जेरबंद करण्यात आलं आहे. या नरभक्षी वाघामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती. त्यामुळे वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी नागरिक करत होते. वनविभागाकडूनही यासाठी प्रचंड प्रयत्न सुरू होते.

आज सकाळी झालेल्या या कारवाईने वनविभागासह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. या वाघाने देसाईगंज जवळच्या एका गाईवर दोन दिवसांपूर्वी हल्ला केला होता. त्यामुळे वाघ तिथे पुन्हा येणार अशी खात्री असल्याने वनविभागाची ताडोबा येथून बोलावण्यात आलेली टीम त्याच्यावर पाळत ठेवून होती. वाघाला तिथे बोलावण्यासाठी जवळच शिकार म्हणून दुसरी एक गायही ठेवली होती.

आज सकाळी हा नरभक्षी वाघ त्या सापळ्यात अडकला. यानंतर वाघ तिथे येताच शूटर टीमने त्याच्यावर बेशुद्धीचे इंजेक्शन डागलं. या नरभक्षी वाघाला आता पिंजऱ्यात बंद करून ठेवलं जाणार आहे. मात्र, नरभक्षी वाघाला पकडण्यात अखेर यश आल्याने परिसरात आणि आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकांनी आता सुटकेचा श्वास सोडला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share