राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत सध्यातरी नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत सध्यातरी नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. मात्र, सणासुदीच्या काळात राज्यात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, पण लसीकरणाची गती वाढवली तर संक्रमण जास्त होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात सध्या दररोज १३ ते १४ लाख जणांना लसीकरण करण्यात येत असून डेल्टाची रुग्णसंख्या सध्या राज्यात स्थिर आहे. त्यामुळे नागरीकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात दररोज १५ ते २० लाख लसीकरण करण्याचा आरोग्य विभागाचा मानस असून आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करून घेण्यासाठी फिरत असल्याचे देखील टोपे यांनी स्पष्ट केले.
राज्यात कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येत चढ-उतार पाहिला मिळत आहेत. रविवारी राज्यात ३ हजार ४१३ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर ८ हजार ३२६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१६ टक्के इतके आहे. सध्या राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यात सध्या ११ हजार ७२० रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share