राजकारण पेटले : अशोक चव्हाणांनी औकातीत राहावं- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर: चंद्रकांत पाटलांना मराठा आरक्षण कायद्यातील काय कळतंय? ते काहीही चुकीची माहिती देत असतात, या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अशोक चव्हाणांनी औकातीत राहावं, असा दमच चंद्रकांत पाटलांनी भरला आहे.

मीडियाशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. अशोक चव्हाणांनी केंद्र सरकारवर बोट दाखवू नये. त्यांनी स्वत: राज्यासाठी काही तरी करून दाखवावं. चव्हाणांनी औकातीत राहावे. त्यांची औकात काय आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही काय करावं ते आम्हाला सांगू नये, असं पाटील म्हणाले.

पुनर्विचार याचिका दाखल करा

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करायला पाहिजे होती. केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केल्याबद्दल त्यांचे आभार. केंद्राने दाखल केलेली ही याचिका म्हणजे हवेची गार झुळूक आहे. आता महाराष्ट्रानेही ही याचिका दाखल करावी, असं ते म्हणाले. 102व्या घटना दुरुस्तीने मराठा समाजाला न्याय मिळाला तर मराठा मागास आहे की नाही आणि 50 टक्क्यांवरील आरक्षणाच्या निकषावर राज्य सरकारने काम केलं पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली.

अजितदादांनी सारथीसाठी काय केलं?

फडणवीस सरकारने ज्या सवलती मराठा-ओबीसी समाजाला जाहीर केल्या होत्या. त्या सवलती तातडीने मराठा-ओबीसींना तातडीने द्याव्यात, असं सांगतानाच सारथीसाठी महिन्याभरात अजित पवारांनी काय केलं? असा सवालही त्यांनी केला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्ज मर्यादा 25 लाख करा. अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे ऑन दी स्पॉट निर्णय घ्या, अण्णासाहेब पाटील महामंडळाला स्वायत्ता द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share