खबरदार…! कॉल रेकॉर्ड केले तर आता गुन्हा दाखल होणार

◼️कॉल रेकॉर्ड करून ब्लॅकमेलिंग करणे भोवणार

प्रहार टाईम्स वृत्त संकलन

नवी दिल्ली: गुगलने नुकतीच कॉल रेकॉर्डिंग करणारी अ‍ॅप आपल्या प्ले स्टोअरवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल अ‍ॅण्ड्रॉईडच्या आधीपासून मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग केले जाते. परंतु, ते बेकायदेशीर असून, शिक्षेस पात्र आहे. तुम्ही अशी चूक केल्यास आणि त्याची तक्रार झाली तर, तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मोबाईल निर्मात्या कंपन्या कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय देत आहेत. परंतु, एखाद्याचा कॉल रेकॉर्ड करणे, हा कायद्याने गुन्हा आहे. कॉल रेकॉर्डिंग करण्यासाठी तुम्हाला संबंधित अधिकार्‍याची परवानगी घ्यावी लागते. यानंतरच तुम्ही एखाद्याचा कॉल रेकॉर्ड करू शकता. यासाठी तुम्हाला पोलिस आयुक्त, अधीक्षक कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी ठोस कारण द्यावे लागेल, ते कारण पटले तरच पोलिस परवानगी देतील. मात्र, या परवानगीशिवाय तुम्ही कॉल रेकॉर्डिंग केले तर ते बेकायदेशीर असल्याचे समजले जाईल.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार प्रत्येक व्यक्तीला गोपनीयतेचा अधिकार आहे. कोणत्याही तृतीय पक्षाच्या परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणे, पूर्णपणे बेकायदेशीर मानले जाते. यासोबतच हे घटनेतील व्यक्तीच्या गोपनीयतेच्या अधिकाराचेही उल्लंघन ठरेल. भारतीय पुरावा कायदा 1872 नुसार, प्रत्येक कॉल रेकॉर्ड न्यायालयात सादर केला जाऊ शकतो. त्याच्या काही अटी आहेत. रेकॉर्ड केलेला आवाज स्पष्ट आणि ओळखण्यायोग्य असणे आवश्यक आहे. रेकॉर्डिंगमध्ये कोणताही हस्तक्षेप नसावा आणि तो प्रकरणाशी संबंधित असावा. रेकॉर्डिंग स्टोरेज उपकरणे सीलबंद करणे आणि पोलिसांच्या ताब्यात देणे आवश्यक आहे तसेच कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय फोटो काढणे आणि व्हिडीओ शूट करणे, हेदेखील कलम 21 चे उल्लंघन मानले जाते.

Print Friendly, PDF & Email
Share