श्रीलंकेवर “अन्नसंकट’, महागाईने कंबरडे मोडले, भारताने पाठवला 40 हजार टन तांदूळ

नवी दिल्ली – शेजारील श्रीलंका देश गेल्या काही काळापासून महागाई आणि गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परकीय चलनाचा साठा जवळपास संपुष्टात आलेल्या आणि अनेक देशांच्या कर्जखाली बुडालेल्या श्रीलंकेसमोर दिवाळखोरीचे संकट उभे राहिले आहे.

श्रीलंकेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक देश पुढे आले आहेत. पण त्यात भारताची भूमिका सर्वात जास्त आहे. अन्न संकट संपवण्यासाठी भारताने श्रीलंकेला 40 हजार टन तांदूळ पुरवठा केला आहे. मोठा दिलासा म्हणजे श्रीलंकेत मोठ्या सणाआधी तांदूळ पुरवठा केला जात आहे. भारताच्या या मदतीमुळे श्रीलंकेला काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

श्रीलंकेत आणीबाणी लागू
श्रीलंकेतील भीषण आर्थिक संकट आणि प्रचंड विरोध निदर्शने यामुळे देशभरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. हिंसाचार आणि निदर्शने पाहता राष्ट्रपतींनी देशभर संचारबंदी जाहीर केली आहे.

श्रीलंकेत महागाई शिखरावर
पेट्रोल पंपावर इंधनासाठी दोन किलोमीटर लांब रांगा लागत आहेत. खाद्यपदार्थ इतके महाग झाले आहेत की लोकांना उपाशी झोपावे लागत आहे. पेट्रोलपेक्षाही महाग दूध विकले जात आहे. एक कप चहाची किंमत 100 रुपयांवर गेली आहे. मिरची 700 रुपये किलोने विकली जात आहे. एक किलो बटाट्यासाठी 200 रुपये मोजावे लागत आहेत. वीजनिर्मितीवरही परिणाम झाला आहे. आता अनेक शहरांमध्ये 12 ते 15 तास वीजपुरवठा खंडित होत आहे. अशा परिस्थितीत भारताने श्रीलंकेला तातडीने एक अब्ज डॉलर्सची मदत दिली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share