पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे भेट : राज्यातील संवेदनशील विषयावर चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्यवस्थित चर्चा झाली असून त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. राज्याचे जे विषय मांडले आहेत त्याची माहिती घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. जे विषय मांडले आहेत ते सकारात्मक पद्धतीने पंतप्रधान मोदी सोडवतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सदनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाणही यावेळी उपस्थित होते.


उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधानांसमोर राज्यातील संवेदनशील विषय मांडले असल्याची माहिती दिली. मराठा आरक्षण, इतर मागासवर्ग आरक्षण, मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय, जीएसटीचा परतावा, शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रश्न, पीक विमा, चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी, मराठा भाषेला अभिजात दर्जा आणि वादळग्रस्तांना मदतीचे निकष याबद्दल मोदींशी चर्चा झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
अशोक चव्हाण यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला असल्याची माहिती दिली. मराठा आरक्षणातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातील महत्वाचे मुद्दे मोदींच्या निदर्शनास आणून दिले असे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले . “आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करावी, अन्यथा राज्यांना अधिकार देऊनही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार नाही,” अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. तसा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात झाला पाहिजे असे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले.


तुमच्याकडे अधिकार असताना निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी विनंती पंतप्रधान मोदींना करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. मराठा असो किंवा ओबीसी आरक्षण असो घटनादुरुस्ती किंवा कायदेशीर मार्ग असतील सकारात्मक भूमिका घ्यावी असे सांगितले असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

“महाराष्ट्राला २४ हजार ३०६ कोटी जीसएटी भरपाई मिळणे बाकी आहे. करोनाचे संकट सर्वांवर असून आर्थिक दिलासा देण्यासाठी हे पैसे लवकर मिळाले तर फायदा होईल,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. वादळाचा फटका बसल्यानंतर मदतीचे निकष बदलण्याची गरजही यावेळी पंतप्रधान मोदींकडे बोलून दाखवण्यात आली. २०१५ चे नियम आपण बदलण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. तसेच १४ व्या वित्त आयोगातील थकीत १ हजार ४४ कोटींचा निधी तात्काळ मिळावी अशी मागणी केल्याचे अजित पवारांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share