प्रतिक्षा संपली…!अखेर केरळात मान्सूनचे दमदार आगमन

तिरुवअनंतपूरम : देशात यंदा मान्सून दोन दिवस उशीरा दाखल होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली होती. मात्र या सर्व अंदाजांना बाजूला करत मान्सून शनिवारी म्हणजेच 30 मे 2021 रोजी केरळात दाखल झाला आहे. स्कायमेट वेदरने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे शेतकरी राजाला थोडासा दिलासा मिळाला असल्याचे दिसत आहे.

1 जूनला मान्सूनचे आगमन होणार असल्याचा प्राधमिक अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. पण, त्यानंतर वाऱ्यांची बदललेली दिशा आणि पूरक वातावरणामुळे मान्सूनपूर्व सरींपाठोपाठ या वरुणराजाने केरळावर आणि देशावर कृपा केली.

मान्सूनच्या आगमनासाठी ठराविक गोष्टींची आणि त्यांच्या पूर्ततेची आवश्यकता असते. दक्षिण पूर्व अरबी समुद्रातील वारे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावून गेले. आता येत्या कालावधीत मान्सूनसाठी देशात पूरक वातावरण निर्मिती होणार असून, तो देशाचा मोठा भाग व्यापेल. उत्तर पूर्व भागातही याचे पडसाद दिसून येतील. किनारपट्टी भागामध्ये जून महिन्याच्या पहिल्या भागात वादळीवाऱ्यांची निर्मिती मान्सूनसाठी आणखी पूरक ठरणार आहे.

याच धर्तीवर उत्तर अंदमान समुद्र आणि पोर्ट ब्लेअर, निकोबार, मायाबंदर अशा भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. केरळ, कर्नाटकचा किनारपट्टी भाग, लक्षद्वीप या भागांमध्येही पावसाची येत्या काळात दमदार हजेरी असणार आहे. दरम्यानच्या काळात समुद्रही खवळलेला असेल, त्यामुळे मासेमारांनीही सतर्क रहावे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share