“मोदी दिलदार आहेत, गुजरातला 1000 कोटी दिले, महाराष्ट्राला 1500 कोटी देतील” संजय राऊतांनी टोचले कान…

मुंबई | तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला 1000 कोटींची मदत जाहीर केली आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रातील नेते हे दिलदार आहेत. पंतप्रधान मोदी यांचे संपूर्ण देशात लक्ष असतं. गुजरातला 1000 कोटी दिले तर ते महाराष्ट्राला तौक्ते चक्रीवादळातील नुकसान भरपाईसाठी 1500 कोटींची मदत देतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

पंतप्रधानांनी गुजरातला तात्काळ मदत केली त्याविषयी आम्हाला दु:ख असण्याचं कारण नाही. मात्र कधीतरी पंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल, अशी आशा मी करतो. पण महाराष्ट्र आणि गोव्याला केंद्र सरकारने अनुक्रमे 1500 आणि 500 कोटींची मदत द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील आज कोकणच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे तेदेखील केंद्र सरकारला कोकणात झालेल्या नुकसानीची माहिती देतील. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही हेदेखील शुक्रवारी कोकणाचा दौरा झाल्यानंतर केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

दरम्यान ,तौक्ते वादळामुळे गुजरात आणि दीव दमणचं मोठं नुकसान झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागाची हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीही होते. यावेळी राज्याला एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात येत असल्याचं मोदींनी जाहीर केलं. वादळातील बळींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना 50 हजाराची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. त्याशिवाय केंद्र सरकार गुजरातमध्ये इंटर मिनिस्ट्रियल ग्रुप पाठवेल. हा ग्रुप राज्यातील नुकसानीची पाहणी करून केंद्राला त्याची माहिती देईल, असं मोदींनी सांगितलं.

Print Friendly, PDF & Email
Share