आरोग्य आणि शिक्षण हेच जीवनाचे महत्वाचे पैलू : आरोग्यमंत्री राजेश टोपे


वृत्तसंस्था / पुणे :
उत्तम आरोग्य ही चांगल्या जीवनाची पहिली पायरी आहे. चांगल्या शिक्षणामुळेच माणसाला आरोग्यभान येते. करोनाच्या संकटाने हे अधोरेखित केले आहे. आरोग्य आणि शिक्षण हेच जीवनाचे महत्वाचे पैलू आहेत, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठाचा 57 वा वर्धापनदिन समारंभ करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ सुखदेव थोरात, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह, विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू व राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, सहकार्यवाह व.भा. म्हेत्रे, डॉ. के.डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे, कुलसचिव जी जयकुमार, यावेळी उपस्थित होते.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी शुन्यातून विश्व निर्माण केले. त्यांच्यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार झाला. ज्ञान, कौशल्य, गुणवत्ता, संशोधन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षणाची गरज आहे. शिक्षण केंद्रे ही संस्कार केंद्रे व्हावीत. कोरोना संकटातील भारती हॉस्पिटलचे कार्य उल्लेखनीय आहे. डॉ. सुखदेव थोरात म्हणाले, उच्च शिक्षणाचा विस्तार होत असताना गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. चांगल्या शिक्षकांचा आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गुणवत्ता वाढीसाठी करणे गरजेचे आहे. दर्जेदार शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांची व्याख्याने तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना उपलब्ध करून दिली पाहिजेत.
आर्थिक विषमतेमुळे उच्च शिक्षणाची संधी नाकारली जाणारं नाही याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाजीराव कदम म्हणाले विद्यापीठात संशोधन संस्कृती निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्राध्यापकांमध्ये ज्ञानलालसा आणि जिज्ञासू वृत्ती असायला हवी. भविष्यात मायक्रोलर्निग आणि शॉर्टटर्म अभ्यासक्रमाचे महत्त्व वाढणार आहे. कौशल्य आणि उत्पादकता यावरच संधी उपलबध होणार आहेत. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले भारती विद्यापीठाने सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या या संकटात विम्याचे सुरक्षा कवच दिले.
भारती विद्यापीठ स्थापनेपासूनच डॉ. पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कायम ध्येयवादाने कार्यरत राहिलेले आहे. शिक्षण क्षेत्रात प्रगतीची झेप घेताना भारती विद्यापीठाने नेहमीच सामाजिक बांधिलकीला सर्वोच्च प्राधान्य दिले. करोनाने वर्क फ्रॉम होम बरोबरच लर्न फ्रॉम होम ही संकल्पना शिक्षणक्षेत्राला दिली. करोनामुळे शिक्षण क्षेत्रासमोर निर्माण झालेल्या आव्हानांचा सर्वांनी विचारपूर्वक सामना केला पाहिजे. प्रा मिलिंद जोशी यांनी स्वागत केले.

Print Friendly, PDF & Email
Share