ऑक्सिजन एक्सप्रेस पोहोचली , राज्याला मिळणार १०० टनहून अधिक प्राणवायू

ऑक्सिजन एक्सप्रेस पोहचली , राज्याला मिळणार १०० टनहून अधिक प्राणवायू

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. रुग्णांची वाढलेली संख्या आणि ऑक्सिजनची मागणी यामुळं ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. पण या परिस्थितीत आज रात्रीनंतर काहीशी सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे विशाखापट्टणमहून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस आज रात्री राज्यात पोहोचत आहे. त्यामुळं अत्यंत तुटवडा असलेल्या भागांत ऑक्सिजनचा पुरवठा करता येणार आहे.
राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी विशाखापट्टणम येथील प्लांटमधून ऑक्सिजन रेल्वेमार्फत आणण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी कळंबोलीहून 7 रिकामे ऑक्सिजन टँकर घेऊन रेल्वे विशाखापट्टणमला गेली होती. त्या रेल्वेनं गुरुवारी रात्रीच भरलेल्या ऑक्सिजन टँकरसह महाराष्ट्राच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्रा पीयूष गोयल यांनी रात्री स्वतः ट्वीट करून याबाबत माहिती दिली. कठीण काळामध्ये रेल्वे देशाची सेवा करत राहील असं गोयल यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान ही ऑक्सिजन एक्सप्रेस शुक्रवारी रात्री नागपूरला पोहोचणार आहे. त्यानंतर शनिवारी सकाळपर्यंत ही एक्सप्रेस नाशिकला पोहोचणार असल्याची माहिती मिळाली आहे. या एक्सप्रेसमधून 7 टँकर म्हणजे जवळपास 100 टनाहून अधिक ऑक्सिजन राज्याला मिळाला आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय स्टील निगमच्या स्टिल प्लांटमधून विशाखापट्टण इथून हा ऑक्सिजन आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर आवश्यकता असलेल्या इतर राज्यांमध्येदेखिल या ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे ऑक्सिजन पुरवला जात आहे. महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशच्या लखनऊकडे देखिल या प्लांटमधून ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना झाली आहे. त्यामुळं आता प्राणवायू उपलब्ध होणार असल्यानं कोरोना विरोधातील लढाईत प्राण फुंकले जाऊ शकतील.

Print Friendly, PDF & Email
Share