ओबीसी संघटनांचा जनआक्रोश मोर्च्याने गोंदिया दणाणले !

गोंदिया ◼️ आरक्षणाला घेवून मागील दिवसांपासून राज्यात उद्भवलेली स्थिती तसेच ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय आणि समाजातील प्रलंबित समस्या या मुख्य मागण्यांना घेवून ओबीसी संघटनांच्या वतीने आज 18 सप्टेंबर रोजी स्थानिक प्रशासकीय इमारतीसमोर जऩ आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने ओबीसी समाज सहभागी झाल्याने मुख्य मार्गावरील वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली होती.

मागील काही वर्षापासून आरक्षणाला राज्य शासन गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. राज्यासह जिल्ह्यात निघणार्‍या विविध पदभरत्यांमध्ये ओबीसीचे आरक्षणावर गदा आणण्यात येत आहे. याशिवाय ओबीसींची जनगणना करण्यात यावी, ओबीसींच्या आरक्षणात मराठा समाजाची घुसखोरी थांबविण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतीगृह सुरू करण्यात यावे, जिल्ह्यातील पोलिस पाटील पदभरतीतील ओबीसींवरील अन्याय दूर करण्यात यावे या मागण्यांसाठी हा महामोर्चा काढण्यात आला. हजारोच्या संंख्येने उतरलेल्या ओबीसी समुदायानेही सरकारला आम्ही आता जागे झालो असा इशाराच जणू काही या जनआक्रोश मोर्च्यातून दिल्याचे बघावयास मिळाले. या जनआक्रोश रॅलीचे नेतृत्व ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी केले. फूलचूर येथून निघालेल्या या मोर्चात गोंदिया, तिरोडा, आमगाव, देवरी, सालेकसा, गोरेगाव व सडक अर्जुनी तालुक्यातील हजारो ओबीसी पदयात्रा व मोटारसायकल रॅली जयस्तंभ चौकाकडे रवाना झाली.

दरम्यान, जयस्तंभ चौकात जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध ओबीसी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले. जनआक्रोश सभेचे संचालन सुनिल पटले यांनी केले. या आंदोलनात ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवासंघ, ओबीसी अधिकार मंच, ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ, महात्मा फुले समता परिषद, ओबीसी अधिकार मंच, युवा ग्रॅज्युएट फोरम, संविधान मैत्री संघ, अवामे मुस्लिम समाज गोंदिया तसेच आदिवासी, युवा बहुजन मंच, एसबीसी, एनटी संघटनांनी, आदिवासी संंघटनासह ओबीसीतील सर्व संघटनाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येेने सहभागी झाले होते.

Print Friendly, PDF & Email
Share