“भाजपाकडून मतदारांनाच ED ची धमकी; नाना पटोलेंचा आरोप

मुंबई  – केंद्रातील सत्ताधारी भाजपकडून विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा सर्रास गैरवापर होत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. ईडीसारखी तपास यंत्रणा तर थेट भाजपाची शाखा असल्यासारखीच काम करत आहे.

या यंत्रणेचा गैरवापर विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाईसाठी करण्यात येत असून आता भाजपाने थेट कोल्हापुरातील मतदारांनाच “ईडी’ची धमकी दिली आहे, असा गंभीर आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

भाजपावर टीका करताना नाना पटोले म्हणाले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील मतदारांना तुमची ईडीकडून चौकशी होईल, अशी जाहीर धमकीच दिली, हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपाचा जनाधार घसरला आहे. स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्राच्या जनतेने जागा दाखवून दिलेली आहे. कोल्हापुरातील पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्ष जिंकणार हे निश्‍चित आहे.

भाजपाला कोल्हापुरात पराभव दिसत असल्याने निराशेपोटी चंद्रकांत पाटील यांनी थेट मतदारांनाच धमकी दिली आहे. काही लोक पेटीएमच्या माध्यमातून पैसे वाटत असून तुम्ही ते पैसे घेतले, तर त्याची चौकशी ईडीकडून केली जाऊ शकते अशी धमकी देण्यात आली आहे. आता ईडी हजार-पाचशे रुपयांची चौकशी करणार का? आणि ती चौकशी भाजपाच्या इशाऱ्यावर होणार का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कोल्हापुरची जनता स्वाभिमानी
मागील सात वर्षात भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यात ईडी, आयकर, सीबीआय गैरवापर वाढला असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात भाजपाला सत्ता मिळाली नसल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. या नैराश्‍येतून ते केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते अशी वक्तव्ये करत असतात. कोल्हापुरची स्वाभिमानी जनता मात्र या पोटनिवडणुकीतही चंद्रकांत पाटील व भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही पटोले म्हणाले.

Print Friendly, PDF & Email
Share