वर्धा 25 : जिल्ह्यातील सेलसुरा येथे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात सात युवक जागीच ठार झाले.
या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून मदत जाहीर केली आहे.
या घटनेची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा अपघातातील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक दोन लाख रुपयांची आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. याबाबत त्यांनी मराठीत ट्विट करत ही माहिती दिली आहे.
नीरज चौहान, प्रथमवर्ष एमबीबीएस, नितेश सिंग, 2015, इंटर्न एमबीएएस, विवेक नंदन 2018, एमबीएबीएस फायनल पार्ट1, प्रत्युश सिंग, 2017, एमबीबीएस फायनल पार्ट 2, शुभम जयस्वाल, 2017, एमबीबीएस फायनल पार्ट 2, पवन शक्ती, 2020एमबीबीएस फायनल पार्ट 1 अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्य़ांची नावे आहेत. मृतांमध्ये भंडाऱ्यातील तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार याच्यासह त्याच्या मित्रांचाही मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान @narendramodi यांनी पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून सेलूसरा जवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर या अपघातात जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
— PMO India (@PMOIndia) January 25, 2022
असा झाला अपघात…
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वजण देवळी येथून वर्धेला निघाले असताना सेलसुरा जवळ या विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात झाला. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने पुलावरून कार थेट 40 फूट खाली कोसळली. इतक्या उंचीवरुन विद्यार्थ्यांची कार खाली पडल्याने सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील सर्व मृत विद्यार्थ्यांची वये 25 ते 35 च्या दरम्यान आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं बचावकार्यास सुरुवात केली होती.








