पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अशातच देशभरात लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काही दिवसांपुर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ‘मिशन कवच कुंडल’ योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याने 100 टक्के लसीकरण पुर्ण केलं आहे.
मुळशी तालुक्यासह खेड आणि आंबेगाव तालुक्यातील शंभर टक्के नागरिकांचा पहिला डोस पुर्ण झाला आहे. मिशन कवच कुंडल योजना मुळशीमध्ये दिवस-रात्र मिळून तब्बल 75 तास राबवण्यात आली.
मुळशी तालुक्यात आयटी आणि एमआयडीसीमुळे स्थलांतर करणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या तालुक्यात उद्दिष्टापेक्षा जास्त लसीकरण झालं आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी शंभर टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे 159 टक्के आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी 106 टक्के आहे.
‘मिशन कवच कुंडल’ या योजनेचं उद्दिष्ट देशात 15 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच दसऱ्याच्या दिवसापर्यंत 100 कोटी नागरिकांचं लसीकरण व्हावं असं केंद्र सरकारचं टार्गेट असल्याचं राजेश टोपेंंनी सांगितलं होतं. तसेच या योजनेचा जास्त चांगला परिणाम ग्रामीण भागात झाला आहे.









