5G साठी मोर्चेबांधणी..! जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल-टाटा एकत्र..!

भारतात लवकरच 5G नेटवर्क सुरु होणार आहे. सध्या रिलायन्स जिओ त्यात आघाडीवर असून, मुंबई, पुण्यासह देशातील प्रमुख शहरांत जिओने 5G नेटवर्कसाठी चाचण्या केल्या आहेत. जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेल व टाटा समूहाने इंटेलबरोबर 5G नेटवर्कच्या विकासासाठी करार केला आहे.

5G तंत्रज्ञानासाठी भारती एअरटेल इंटेलचे खुल्या ध्वनिलहरीचे जाळे( vRAN / O-RAN) तंत्रज्ञानाचा लाभ घेणार आहे. एअरटेलने भारतात 5-G नेटवर्कसाठीचा रोडमॅप तयार केला आहे. एअरटेल आपल्या नेटवर्कमध्ये थर्ड जनरेशनचे झेऑन स्केलेबल प्रोसेसर, एफपीजीए आणि ईएएसआयसी आणि इथरनेट 800 सीरीज आणणार आहे.

जपानच्या ‘डोकोमो’च्या साहाय्याने यापूर्वी दूरसंचार क्षेत्रात आलेल्या टाटाने ‘5G’साठी इंटेल, तसेच एअरटेलबरोबर काम करण्याचे निश्चित केले आहे. टाटा समूहातील ‘टीसीएस’ कंपनीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, गुजरात, हैदराबादसह ग्रामीण भागात 5G च्या चाचण्या करण्यात येणार आहेत.

डाउनलोड स्पीड वाढणार
ग्राहकांना 4G च्या तुलनेत 5G तंत्रज्ञानाद्वारे दहापट चांगले डाउनलोड स्पीड आणि तीनपट स्पेक्ट्रम कार्यक्षमता मिळेल. जगातील दुसऱ्या क्रमांकाची इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या भारतात आहे. 2025 पर्यंत भारतातील सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 90 कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

Print Friendly, PDF & Email
Share