वरातीची बस नाल्यात कोसळल्याने एकाचा मृत्यू तर २४ जण गंभीर जखमी

बल्लारपूर : काल रात्री वरातीने भरलेली बस नाल्यात पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर २४ बाराती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून त्यात ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
हा अपघात बल्लारपूर तालुक्यातील किन्ही गावाजवळ घडला.

लग्न समारंभ आटोपून परत जातांना येनबोडी जवळील किन्ही गावाजवळ रात्री ९ वाजताच्या सुमारास एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नाल्यात पडली. सुदैवाने त्यात पाणी नव्हते. बसमध्ये जवळपास ६० जण होते. लग्नाची वरात राजुरा वरून नांदगाव (घोसरी) कडे परत जात होती. अपघातात सुनंदा हरिदास मडावी या ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला.

अपघात होताच, मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस येण्यापूर्वीच ग्रामस्थांनी जखमींना बसमधून बाहेर काढण्यास सुरुवात केली होती. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बल्लारपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे व त्यांचे पोलीस पथक पुढील तपास करत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share