जंगलात पाणवठ्याची संख्या वाढवा, निसर्गप्रेमीची मागणी

◼️तापमानात वाढ होताच पाण्यासाठी प्राण्यांचा गावात शिरकाव

देवरी ■ पाण्याच्या शोधात जंगलातील वन्यप्राण्यांच्या परिसरातील गावात शिरकाव वाढला आहे. पाण्यासाठी प्राण्यांचा गावात शिरकाव थांबविण्यासाठी दुर्गम गाव पसिरातील जंगलात कृत्रिम पाणवठ्यांची संख्या वाढविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी आणि निसर्गप्रेमींनी केली आहे.

तालुक्यातील परिसरातील जंगलवेष्ठीत गावालगत बिबट, अस्वल, हरिण सारखे प्राणी येत असून मोठ्या प्रमाणात त्यांचा वावर असल्याचे वृत्त आहे. पाण्याच्या शोधात मानवावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच गोठ्यात बांधलेल्या प्राण्यांना ठार केल्याच्याही कित्येक घटना घडल्या आहेत.

उन्हाळा सुरु झाला असून जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटून पाणी संपणार आहे. अशात वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जंगलालगतच्या गावात शिरतात. यातूनच हल्ल्यांना सुरुवात होते. या वन्यप्राण्यांना जंगलातच पाण्याची सोय झाल्यास त्यांचा गावातील शिरकाव होणार नाही व अप्रिय घटना घडणार नाहीत. यामुळे वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन जंगल परिसरात कृत्रिम पाणवठ्यांची संख्या वाढवून प्राण्यांचा गावाकडे होणारा वावर थांबविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share