19 हजार 122 विद्यार्थ्यांची आजपासून ‘परीक्षा’

गोंदिया: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी बारावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. शाळा- महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने शुक्रवार 4 मार्चपासून सुरू होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला, तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करूनच परीक्षा घेण्यात येणार आहे. कोरोनामुळे यंदा प्रथमच विद्यार्थ्यांना अर्धा तास वाढीव दिला आहे.

जिल्ह्यात यंदा बारावीचे 19 हजार 122 परीक्षार्थी आहेत. जिल्ह्यातील 74 मुख्य केंद्रांसह 148 उपकेंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या नियोजनाची जिल्हा शिक्षण विभागाने पूर्ण तयारी केली आहे. कोरोनामुळे 12 वीचे 15 पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या प्रत्येक शाळेत परीक्षा उपकेंद्र देण्यात आले आहे. या प्रत्येक केंद्रातील परीक्षा खोलीमध्ये 25 विद्यार्थ्यांची व्यवस्था झिगझॅग पद्धतीने केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वीप्रमाणेच होणार आहे. परीक्षेचे विद्यार्थ्यांवर दडपण येऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने समुपदेशकांची निवड देखील केली आहे. कोरोनामुळे प्रत्येक शाळेत उपकेंद्र सुरू केले आहे. 15 पेक्षा जास्त विद्यार्थी असणार्‍या शाळांत उपकेंद्रे सुरू केली आहेत. ज्या शाळेची विद्यार्थिसंख्या 15 च्या आत आहे, अशा शाळांना जवळील उपकेंद्रावर परीक्षेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परीक्षा केंद्र व उपकेंद्रांवर कोरोना नियमावलीचे पालन करून परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षा काळात आजारी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्यांना आजारपणामुळे परीक्षा देणे शक्य नाही. त्यांना जुलैमध्ये पुनर्परीक्षेची सुविधा आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना कंपास, पेन, पट्टी व पाण्याची बाटली आणावी असे आवाहन जिल्हा शिक्षण विभागाने केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share