एक दिवस देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही येतील: संजय राऊत

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी गेले, हे पाहून मला खूप बरे वाटले. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक मतभेद असले तरी कोणीही एकमेकांचा वैयक्तिक शत्रू नसतो. ही आपल्याकडची परंपरा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस एक दिवस मातोश्रीवरही येतील, असा विश्वास मला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांना फडणवीस यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेळी संजय राऊत यांनी खेळीमेळीच्या वातावरणात या टीकेला प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या वेदना मला समजतात. माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली असे फडणवीसांना वाटते. पण फडणवीस हे माझे मित्र होते आणि राहतील. त्यामुळे मी त्यांची टीका गांभीर्याने घेत नाही. पण देवेंद्र फडणवीस शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी गेले हे पाहून चांगले वाटले. यापूर्वी मी सुद्धा एकदा लंचसाठी त्यांना भेटलोय, आता पुन्हा भेटू. देवेंद्र फडणवीस यांनी पुढील तीन-चार वर्ष विरोधी पक्षात राहून टीका करण्याचा आनंद घ्यावा. मला ते आवडेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.

‘विरोधी पक्ष हळूहळू जमिनीवर येतोय’

देवेंद्र फडणवीस हे शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी गेले हे विरोध पक्ष हळूहळू जमिनीवर येत असल्याचे द्योतक आहे. एक दिवस कदाचित देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही येतील. निवडणुका आल्यावर आपण एकमेकांवर टीका करतोच, मग आता परस्परांवर विनाकारण धुरळा कशाला उडवायचा, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

‘तोल ढासळलेल्या व्यक्तीवर बोलणार नाही’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे, त्यांच्यावर उपचाराची गरज आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांतदादांवर निशाणा साधला. तुम्हीच म्हणालात ना चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे. मग तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं. त्यांच्यावर उपचाराची गरज असते, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share