एक रुपयात मिळणारा पीक विमा अखेर बंद

गोंदियाः एक रुपयात मिळणारी पीकविमा योजना राज्य शासनाने अखेर बंद केली असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेण्यात आला आहे. योजना बंदकरतांना शासन गैरव्यवहार होत असल्याचे कारण देत असले तरी या योजनेत घोटाळेबाजांनीच हात धुतल्याचे सर्वश्रुत आहे. याकडे दुर्लक्ष करीत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर ठपका ठेवला जात असल्याने ग्रामीण भागात तीव्र भावना व्यक्त होत आहे.

ही पीक विमा योजना गुंडाळल्यावर आता तातडीने राज्याच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने पत्र काढून कृषी आयुक्तांना पुढील वर्षीपासून वेगळी पीकविमा योजना राबविण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. ही योजना दोन वर्षे चालली. मात्र, योजनेत अनेक गैरव्यवहार होत असल्याचे कारण देत राज्य शासनाने ही योजना आता गुंडाळली आहे. विशेष म्हणजे या एक रुपयाच्या विमा योजनेत कोट्यावधीचा भ्रष्टाचार करून घोटाळेबाजांनी आपापले हात धूवून घेतल्याचे स्पष्ट होत आहे. ही योजना राबविल्यापासूनच सीएससी सेंटरकडून मनमानी कारभार सुरु असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात होत्या. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातील सीएससी सेंटरवरून बोगस पीकविमा उतरविला जात होता. एका अर्जासाठी सीएससी सेंटरच्या चालकाला चाळीस रुपये राज्य सरकारकडून दिले जात होते. त्यामुळे या योजनेचा अधिक लाभ घेण्यासाठी केंद्र चालक बोगस अर्ज भरत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

यामुळे कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही योजना बंद करण्याची शिफारस पाठविल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन ही योजना येत्या खरीप हंगामापासून बंद करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात शिवसेना-भाजपा महायुतीचे सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात एक रुपयाम पीकविमा योजनेची सुरुवात झाली. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करून अंमलबजावणी सुरु करण्यात आली. आता या योजनेत गैरव्यवहार झाल्याचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे या योजनेत बदल करत एक रुपयाचा विमा भरणा बंद करण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील जल, महावितरण, जंगल, गायरान जमीन, वनखात्याच्या जमिनीवर पीकविमा भरण्याचा दावा एका आमदाराने विधानसभेत केला होता. यावर समितीकडून अहवाल घेऊन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेत येत्या खरीप हंगामापासून एक रुपयाचा पीकविमा बंद करत अनेक बदल करण्यात आल्याचे सांगीतले आहे

Share