गोंदिया जिल्ह्यातील १४ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित तर आठ कायमचे रद्द

गोंदिया :जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी- बियाणे, खते व कीटकनाशकांच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने ९ भरारी पथकं स्थापन केली आहेत. भरारी पथकांमार्फत अचानक तपासणी धडक मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील १४ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित तर आठ केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले.

कृषी केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यांमध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहीत मुदतीत नूतणीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, विक्री करीत असलेल्या कृषी निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे, ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणे, परवाना घेऊनसुद्धा आर्थिक वर्षात एकदाही व्यवहार न करणे आदी कारणांमुळे १४ निविष्ठाधारकांचे परवाने दोन महिन्यांकरिता निलंबित करण्यात आले आले.

या कृषी केंद्राचे परवाने दोन महिन्यांसाठी रद्द –

हर्षित ट्रेडर्स कृषी केंद्र काटी, ता. गोंदिया (बियाणे), रतनेरे कृषी केंद्र मरारटोला, ता. गोंदिया (बियाणे), हिमेश कृषी केंद्र भदयाटोला, ता. गोंदिया (बियाणे व कीटकनाशके), जय किसान कृषी केंद्र बनाथर, ता. गोंदिया (बियाणे व कीटकनाशके), पवन कृषी केंद्र वडेगाव, ता. गोंदिया (बियाणे व कीटकनाशके), मनोज कृषी केंद्र चिरामणटोला, गोंदिया (बियाणे व कीटक- नाशके), माँ. भगवती कृषी केंद्र खातीया, ता. गोंदिया (खत व कीटक- नाशके), मांडोदेवी कृषी केंद्र, ता. सालेकसा (खत), उपराडे कृषी केंद्र निंबा, ता. सालेकसा (खत) असे एकूण १४ परवाने दोन महिन्यांकरिता निलंबित करण्यात आले आहेत.

कृषी विभागाकडे करा तक्रार –

कृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे, रासायनिक खतांची साठेबाजी व खताची लिंकिंग केली अथवा जादा दराने खत विक्री केल्यास कायद्यांतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल. शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्राकडून खते, बियाणे व कीटकनाशकांची खरेदी करावी. खरेदी करतांना कृषी निविष्ठा केंद्राकडून निविष्ठा खरेदीची पक्के बिलं घ्यावीत.

या केंद्राचे परवाने कायमचे रद्द –

भुवन कृषी केंद्र रावणवाडी, ता. गोंदिया बियाणे परवाना यांचे कायद्यांतर्गत तर चव्हाण कृषी केंद्र, चिल्हाटी ता. गोरेगाव (खत), अनुराग कृषी केंद्र कालीमाटी, ता. गोरेगाव (खत), संजीवनी कृषी केंद्र. हिरापूर, ता. गोरेगाव (खत), जय बजरंग कृषी केंद्र, कालीमाटी, ता. गोरेगाव (खत), गुरु माऊली कृषी केंद्र, घुमर्रा, ता. गोरेगाव (खत), श्रीकांत कृषी केंद्र अर्जुनी / मोरगाव (बियाणे व कीटकनाशके) परवाना विनंतीनुसार, असे एकूण ८ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे.

एमआरपीप्रमाणे मालाची खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे, तसेच एमआरपीपेक्षा जादा दराने मालाची विक्री होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी. त्याची तत्काळ दखल घेऊन बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, कीटकनाशक कायदा १९६८, कीटकनाशके नियम १९७१ नुसार कार्यवाही करण्यात येईल. 

Share