२१ व्या शतकात ओवारा’वासीयांचे भाग्य उजळणार का?

◼️निष्क्रिय लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे रस्त्यांचे हाल

देवरी ◼️तालुक्यातील डोंगरगाव – ओवारा मुख्य रस्त्या कित्येक वर्षापासून “जैसे थे ” स्थितीत असून, रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या मार्गावरून येणाऱ्या प्रवाश्यांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यावर एखाद्या प्रवाशाचा अपघात केव्हा घडून येईल.याचा नेम नाही. या मार्गाची पुर्णतः चाळण झालेली आहे. याकडे क्षेत्रीय लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन डोळे झाकून, सामान्य जनतेचा कौतिक पाहत असल्याचे चित्र आहे. या मार्गावर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर जबाबदारी वर्तमानकालीन लोकप्रतिनिधी स्विकारणार काय?. असा सवाल जनता करीत आहेत.

सविस्तर असे की, देवरी ते आमगाव या मुख्य मार्गावरील मौजा डोंगरगाव वरून पश्चिमेस ओवारा मार्ग जात असून, हा मार्ग थेट कोहमारा ते गोंदिया मार्गाला जवळपास गोरेगाव जवळ भेटते. या मार्गावरून शॉर्टकट मारणारे प्रवाशी दिवसरात्र प्रवास करीत असतात. कमी अंतर असल्यामुळे या मार्गावर प्रवाशांची वर्दळ जास्त वाढली आहे. सदर रस्ता डोंगरगाव ओवारा या दोन्ही गावाच्या शेतशिवारातून जात असून, या मार्गावरून शेतकरी शेतमालाची ने – आन याच मार्गाने आपल्या साधनानुसार करीत असतात. या मार्गावरून शेतकऱ्याबरोबर विद्यार्थी, मजूरवर्ग, अन्य प्रवासी आपल्या साधनाशीर प्रवास करतात.

डोंगरगाव – ओवारा मार्ग अनेक वर्षापासून, नव्या मार्गाची प्रतीक्षा करीत आहे. या मार्गाची दिवसेंदिवस चाळण होत असून, जागोजागी खड्डे पडलेले आहे. प्रवाशांनी या रस्त्यावरून प्रवास कसा करावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी तसेच इतऱ्याना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला दुतर्फा वाढलेली झाडांची फांदे मार्गात अडसर निर्माण करीत आहेत. सदर रस्ता जास्तीत जास्त नागमोडी वळण घेत असून, वाढलेली झाडांची फांदे अपघाताला घातक आहे. डोंगरगाव ओवारा मार्गाची लवकरात लवकर दखल न घेतल्यास सामान्य नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागेल. आणि जर एखाद्या सामान्य नागरिकाचा अपघात होऊन जीव गेला तर, याची जबाबदारी प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी घेईल काय? असा सवाल क्षेत्रातील स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Share