नात्यातिल गोडवा जिवंत ठेवा…!

शब्दांकन @प्राचार्य डॉ.सुजित टेटे

नात्यात बांधुनी मजला,
जीवन सुंदर सजला..।
शब्दातिल तो गोडवा,
गर्दीत हरवत चालला?

नात्यांचा जमाखर्च मांडायला गेलं की खूप गोंधळ उडतो कारण नात्यांपेक्षा माणसांचीच गर्दी जास्त होते. नात्यांना मोकळेपणाने श्वास घेऊ दिला तर त्यांना वाढायला, बहरायला मदतच होईल. नाती हि मनासाठी टॉनिकचं काम करत असतात .आपल्या मनाचं स्वास्थ जपण्यासाठी नाती जपणं खूप महत्वाचं झालं आहे. प्रत्येकालाच मला वाटते नात्यांची… माणसांची गरज असते. पण काहींच्या ते लक्षात येत तर काहींच्या नाही…? प्रत्येक नात्याला एक वेगळी जागा देण्याची गरज असते .

नातं टिकवणं हे हि एक कौशल्याचं काम आहे. सगळ्या कसरती पार करून नाती हि टिकवावी लागतात कारण नात्यांसोबत जगण्यालाच अर्थ आहे. हे नात्यांचे गणित जमले तर सुख आपोआपच निर्माण होत जाते, एकमेकांच्या आवडीनिवडीला प्राधान्य देत , प्रोत्साहन देत हे नातं जपलं तर मनाचा कोपरा कसा मोकळं मोकळं हसतो. मोजकीच नाती जपावीत पण त्यातून एकमेकात आनंदाची देवाणघेवाण होण्याइतपत ती मस्त असावीत त्यात गोडवा असावा मनापासून केलेल्या संवादांचा.

आपल्याभोवती नेहमीच आतून बाहेरून स्वच्छ सुंदर पारदर्शी मन असलेली माणसं असावीत, त्यांचे संपर्कांतील प्रत्येक माणसांशी वागणेबोलणे स्वच्छ निर्मळ असावे.ज्यांच्याशी मनमोकळं बोलल्यानंतर प्रसन्न वाटावं,सुखदुःखाच्या प्रसंगी एकमेकांना आधार देण्याइतपत त्यांच्यात सहकार्य भावना असावी.एखाद्या चुकीच्या गोष्टींसाठी परखडपणे एकमेकांचे कान पकडण्यापर्यंत अधिकार आणि मायेचा ओलावा असावा.कोणत्याही प्रकारचा गैरसमज होणार नाही इतपत निर्मळ निरपेक्ष नातं मनामनात असावं.

कौटुंबिक कार्यक्रमात वा इतर ठिकाणी भेटल्यानंतर एकमेकांशी बोलायला तितकीशी सवड मिळत नाही, परंतु या पिकनिकला गेल्यानंतर मात्र मनमोकळेपणानं खूप गप्पा मारता येतात सुटीच्या कालावधीत नातेवाईकांना भेटण्याबरोबर स्वत:ला विश्रांती, आनंदही मिळत असतो असतो. मग अशा वेळी छोटयामोठया सहलींचे नियोजन करून दोन्ही हेतू साध्य होत असतात. काही माणसांबरोबर बालपण पुन्हा अनुभवता येतं आणि काही माणसांबरोबरची नाती घट्ट करता येतात.

मोकळा श्वास घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. जवळच्या मंडळींना भेटण्याची इच्छाही पूर्ण करायची आणि स्वत:लाही ताजतवान करायचं असेल तर कुटुंबासोबत पर्यटन करण्याने नातीही जपली जातात आणि मनाला ताजेतवानेपणाची जाणीवही होते. आणि त्यातूनच नात्यातला गोडवा सहजपणे जपला जातो… जोपासला जातो कुटुंबातली नातीही जपायची आणि स्वत:लाही विश्रांती, आनंद मिळवायचा आहे यासाठी बर्‍याच वेळा पिकनिक्स, ट्रिप्सच्या निमित्ताने नात्यातला गोडवा जपायला मदत होत असते. कोणाचाही मनापासून आदर केल्याने… एकमेकांसोबत वागताना समजूतदारपणा दाखवल्याने नात्यातील गोडवा टिकून राहतो.

Print Friendly, PDF & Email
Share