Gondia: जिल्हा परिषदेच्या 373 शाळांमध्येच पिण्याचे शुद्ध पाणी

गोंदिया: जिल्हा परिषद शाळेचे नाव घेताच भौतिक सुविधांची समस्या डोळ्यासमोर येते. गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळाही याला अपवाद नाहीत. गोंदियात जिल्हा परिषदेच्या 1 ते 8 वी पर्यंतच्या 1 हजार 39 शाळा आहेत. त्यापैकी 373 शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. काही शाळांमधील विद्यार्थ्यांना विहीर, नळ व हातपंपच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. शासनाचा पुरस्कार मिळालेली भागी गावाच्या शाळेची देखील अशीच अवस्था आहे. एकीकडे शाळा डिजिटल करण्याचा घाट घातला जात आहे तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना साधे पिण्याचे शुद्ध पाणी देखील मिळत नाही, अशी अवस्था बहुतेक जिल्हा परिषद शाळांची आहे.

गोंदिया जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत 1 हजार 39 शाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये दीड लाखांपेक्षा जास्त गरीब व सामान्य कुटुंबांतील मुले शिक्षण घेत आहेत. समग्र शिक्षा अभियानामार्फत विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण दिले जाते. मात्र, जेवणासोबत पिण्याच्या शुध्द पाण्याची सोय Pure drinking water उपलब्ध करून देण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. शिक्षण अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 हजार 39 शाळांपैकी फक्त 373 शाळांमध्ये शुद्ध पाण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इतर विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. अशुद्ध पाणी पिल्याने जलजन्य आजाराची शक्यता नाकारता येत नाही. 373 शाळांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. 666 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी नळ, हातपंप व विहीरीच्या माध्यमातून मिळते. म्हणजेच निम्याहून अधिक शाळांमध्ये शुद्ध पाणी मिळण्याची शाश्वती नाही.

येत्या बुधवार 29 जून पासून जिल्हा परिषदेच्या शाळा भरणार आहेत. त्यातच आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत बहुतांश आजार दुषित पाण्यामुळे होतात. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर अशुद्ध पाण्यावरच विद्यार्थ्यांना तहान भागवावी लागणार आहे . गेल्या अनेक वर्षांपासून शाळांमधील अशुद्ध पाण्याचा विषय रेंगाळलेला आहे. मात्र त्याकडे लक्ष देण्याची तसदी ना लोकप्रतिनिधी, अधिकारी घेताना दिसत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विषय ऐरणीवर आला आहे. शिक्षणावर ग्रामपंचायतींना वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून 5 टक्के खर्च करण्याचे अधिकार दिले आहे. ग्रामपंचायतींनी आणि जिल्हा परिषदेने संबंधित शाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पालक, विद्यार्थी करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share