एकट्या महिलेने 36 मे. टन काकडीचे उत्पादन घेतले

गोंदिया: कोरोना महामारीने पतीचे निधन झाल्यावर न डगमगता आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ‘त्या’ एकल महिलेने शेती व्यवसायाकडे वळल्या. त्यांनी दृढ निश्चय करुन भाजीपाला पिकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले व कृषी विभागाच्या मार्गदर्शनात उन्हाळी हंगामात 0.60 हेक्टर क्षेत्रात 36 मे. ट्रन काकडी पीकाचे उत्पादन घेतले. यातून त्यांनी 1 लाख 86 रुपयांचा निव्वळ नफा मिळविला. पल्लवी वैभव गजभिये रा. डोंगरगाव असे त्यांचे नाव आहे.

कोरोना लाटेत अनेक कुटूंबातील कर्त्या पुरुषाचा तर काही कुटूंबात मुलांचे आईवडीलांचे छत्र हरविले. शासनाकडून अशा कुटूंबीयांना विविध योजनेतंर्गत लाभ दिले जात आहेत. असे असले तरी परिस्थितीला सामोरे जात स्वतःच्या बळावर कुटूंबाच्या उदरनिर्वाहाकरिता उभे राहणारे विरळच. पल्लवी गजभिये यांनी कुणाचाही मदतीची अपेक्षा न करता घरची शेती कसण्यासाठी हाती घेतली. कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले व सन 2021-22 मध्ये उन्हाळी हंगामामध्ये काकडी पिकाची लागवड केली. तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडून एकात्मिक फलोत्पादन अभियान अंतर्गत मिळालेल्या प्लॉस्टीक मल्चींग व पंतप्रधान कृषि सिंचन योजना मिळालेल्या ठिबकसंचाचा वापर करुन त्यांनी 0.60 हेक्टर क्षेत्रात 36 मे.टन उत्पादन घेतले.

यासाठी जमीन तयार करणे, बियाणे, खते, किटकनाशके, बांबू, प्लॉस्टिक मल्चींग, ठिबकसंच व मजूरी या घटकाकरीता 2 लाख 50 हजार रुपये एवढा खर्च आला. तर स्थानिक बाजारपेठेत व कृषि उत्पन्न बाजार समिती नागपूर येथे मालाची विक्री केली. प्रती किलो सरासरी 12 रुपये बाजारभाव मिळाला. त्यानुसार एकूण उत्पन्न 4 लाख 36 हजार रुपये मिळाले. खर्च वजा जाता एका हंगामामध्ये निव्वळ नफा रक्कम 1 लाख 86 हजार रुपये झाला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भाजीपाला पिकाची लागवड केल्यामुळे कठीण परिस्थितीत आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चांगल्याप्रकारे करत आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक उन्नती साधल्या गेली व कौटूंबिक स्तर उंचावला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share