महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही- राजेश टोपे

मुंबई 22: ऑक्सिजनअभावी महाराष्ट्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. राज्याकडे उपलब्ध असणारा साठा मर्यादित होता. रात्रीतून गाडी पोहोचली नाही, तर सकाळी ऑक्सिजन मिळणार नाही, अशी परिस्थिती होती पण ऑक्सिजनअभावी कोणाला जीव गमवावा लागला नाही, असं राजेश टोपेंनी म्हटलंय.

उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचं योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यामुळे कुठेही ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाला नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राजेश टोपे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

ऑक्सिजन लावलेला एखादा रुग्ण स्वच्छतागृहात जात असेल तरी तेवढ्या वेळेपुरताही ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला जात होता, असं सांगत काटकसर केल्यामुळेच ऑक्सिजन सर्वांना पुरवता आल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं प्रतिदिन 16 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध केला आणि यापुढेही ऑक्सिजनचा तुटवडा पडेल याची शक्यता नसल्याचंही राजेश टोपे म्हणालेत.

नाशिकमध्ये घडलेली दुर्घटना हा अपघात होता. मात्र त्या घटनेत गेलेले बळी हे ऑक्सिजनअभावी गेलेले बळी असं म्हणणं चुकीचं होईल. तो एक अपघात होता आणि असे अपघात इतरत्र होऊ नयेत, याची खबरदारी घेण्यात आली होती, असंही राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

Print Friendly, PDF & Email
Share