युवा उत्सवातून युवकांच्या कलागुणांना वाव

गोंदिया◼️ केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत नेहरु युवा केंद्राच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय युवा उत्सवातील विविध स्पर्धांच्या माध्यमातून महाविद्यालयातील शिक्षणाबरोबरच युवकांच्या कलागुणांना वाव मिळतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शुभांगी मेंढे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजचे प्राचार्य सी. जी. गोळघाटे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य हेमंत आवारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अविनाश लाड, नेहरु युवा केंद्राच्या युवा अधिकारी श्रृती डोंगरे, जनशिक्षण संस्थेचे संस्थापक विनायक डोंगरवार व आरसेटीचे सतीश झाडे उपस्थित होते. नेहरु युवा केंद्राद्वारे आयोजित जिल्हास्तरीय युवा उत्सवामध्ये कविता लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, समुह लोकनृत्य, मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा व चित्रकला स्पर्धेत युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपल्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव द्यावा व आपले भविष्य उज्ज्वल करावे.

नवनविन कला अवगत करण्याची आपल्यामध्ये उत्सुकता असायला पाहिजे. केंद्र सरकारच्या माध्यमातून नेहरु युवा केंद्राद्वारे विविध योजना राबविण्यात येतात, त्या योजनांचा लाभ घेऊन युवकांनी स्वत:चा व्यवसाय सुरु करावा. अशा युवा उत्सवाच्या माध्यमातून युवकांनी आपल्यामध्ये असलेले कौशल्य गुण सादर करुन आपले भविष्य घडवावे असे ते म्हणाले. भारत यावर्षी जी-20 शिखर परिषदेचे प्रतिनिधीत्व करीत आहे, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. जी-20 व वाय-े20 विषयी माहिती सांगतांना वसुधैव कुटूंबकम या ब्रिदवाक्याचे सविस्तरपणे विवेचन करुन युवकांनी पाश्चिमात्य संस्कृतीला नाकारुन भारतीय संस्कृतीचा स्विकार करावा. वडिलधार्‍या व्यक्तींचा आदर करावा असे शुभांगी मेंढे म्हणाल्या. प्रास्ताविक श्रृती डोंगरे यांनी केले. प्रसंगी जलजागृतीची शपथ व जलसंरक्षण पोस्टरचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी जन शिक्षण संस्था गोंदिया रुची महिला बचत गट, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, कला ड्रॉईंग पेन्टींग स्केच, कृषी विभाग, नाबार्ड, महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषि विभाग (केंद्र शासन) इत्यादी स्टॉल लावण्यात आले होते. युवा उत्सवामध्ये आयोजित विविध स्पर्धांचे परीक्षण कुलदिपीका बोरकर, कविता राजाभोज, संगीता घोष, मिलींद रंगारी व रवि चंद्रिकापुरे यांनी केले. संचालन प्रा. डॉ. बबन मेश्राम यांनी केले. आभार श्रृती डोंगरे यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share