महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया

नाशिक 09– महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आपल्यावर करण्यात आलेले आरोप निराधार आहेत त्यामुळे आपल्याला या प्रकरणातून दोषमुक्त करावे, अशी विनंती छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी एसीबी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान याआधीच एसीबीने याच महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील पाच आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.

निर्दोष मुक्ततेनंतर भुजबळ यांची प्रतिक्रिया ..

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. “महाराष्ट्र सदन प्रकरण हे जगभर गाजलं. पंचतारांकित हॉटेलसारख्या बांधलेल्या या सदनाचा अनेक राजकीय पक्ष त्याचा वापर करत आहेत. महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटदाराला मंत्रीमंडळाने ठरवले होते की हे बांधकाम झाल्यानंतर तुम्हाला 100 कोटी रुपयांचा एफएसआय देऊ असे सांगितले होते. आजपर्यंत त्या कंत्राटदाराला एक फूट जमिनही मिळालेली नाही. तरीसुद्धा आरोप करुन महाराष्ट्र सदनामध्ये 800 कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप करण्यात आला. मिडीया ट्रायल सुद्धा झाली. त्यामुळे सव्वा दोन वर्षापेक्षा जास्त काळ आम्हाला तुरुंगामध्ये राहावं लागलं.

आमचा काही दोष नसल्याने आम्हाला या प्रकरणातून वगळ्यात यावं यासाठी वकिलांतर्फे याचिका करण्यात आली होती. त्यानंतर आता आम्हाला या प्रकरणातून निर्दोष म्हणून वगळण्यात आलं आहे. ईडीची कारवाई ही महाराष्ट्र सदन प्रकरणातून पैसे मिळाले यातून ही केस बांधली गेली आहे. अतिशय विनम्रपणे संयम करुन आम्ही या यशाचा स्विकार केला आहे. कुणाही बद्दल आमच्या मनामध्ये द्वेषबुद्धी नाही. कुणाच्याही बद्दल तक्रार नाही. काही वेळेला नियतीच्या मनामध्ये जे असतं त्याप्रमाणे घडतं. साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिये, ये तो आपकी जनता की दुआयें है की उन्हें मुकम्मल नहीं होने देती,” असे म्हणत भुजबळांनी सर्वाचे आशिर्वाद सोबत असल्याचे म्हटले आहे.

काय आहे महाराष्ट्र सदन घोटाळा?
छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. महाराष्ट्र सदन आणि इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 11 जून 2015 रोजी स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर 15 जून 2015 रोजी सक्तवसुली संचालनालयानेही भुजबळ यांच्या विरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये दोन गुन्हे दाखल केले होते.

Print Friendly, PDF & Email
Share