25 सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत प्रलंबीत प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याची संधी

गोंदिया 2 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,दिल्ली यांच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया यांचेमार्फत जिल्हा न्यायालय, कामगार न्यायालय गोंदिया तसेच जिल्ह्यातील तालुका विधी सेवा समित्यामार्फत सर्व तालुका न्यायालयामध्ये 25 सप्टेंबर
2021 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोकअदालतीमध्ये न्यायालयात दाखल करण्यापुर्वीचे प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल असलेली तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, एन.आय.ॲक्ट कलम 138 ची प्रकरणे, बँक रिकव्हरीची प्रकरणे, वैवाहिक/कौटुंबिक वादाची
प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भू-संपादनाची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे,भाडे वसूली, बँक वसूली, प्राधिकरणाची कर्ज वसूली प्रकरणे, विद्युत व पाणी बिलाची (चोरीची प्रकरणे सोडून) प्रकरणे, तसेच सर्वच प्रकारची तडजोडपात्र दाखल तसेच दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. ही प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरीता न्यायाधीश, तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे पॅनल मदत करणार आहे.

संबंधित पक्षकारांनी आपली दाखल प्रकरणे सदर लोकअदालीतमध्ये तडजोडीकरीता ठेवायची आहेत. संबंधितांनी न्यायालयात तसा अर्ज 18 सप्टेंबर 2021 पर्यंत सादर करावा. तसेच दाखलपूर्व प्रकरणाकरीता सर्व बँकांनी,संबंधितांनी किंवा अर्जदारांनी सुध्दा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया येथे किंवा तालुका विधी सेवा समितीकडे 18 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावा. सर्व संबंधीत पक्षकारांनी त्यांची प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये तात्काळ निकाली काढण्यासाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share