अभिनेता विजय राजला जामीन मंजूर, पोलीस ठाण्यामध्येच काढली एक रात्र

गोंदिया, 3:

काल रात्री विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला हास्यअभिनेता विजय राजला जामीन मंजूर झाला आहे.गोंदियातील रामनगर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला कालच अटक करण्यात आली होती. आज न्यायालयाने त्याला जामीन दिला.विजय राज याच्याविरोधात ‘शेरनी’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी ही घटना घडली. शूटिंग क्रूमधील एका महिलेने विनयभंगाची तक्रार केली आहे. त्यानंतर गोंदिया येथील रामनगर पोलीसांनी त्याला अटक केली होती. विजय राज याला कालची रात्र पोलीस ठाण्यात काढावी लागली होती. आज पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता विजय राजला जामीन मंजूर करण्यात आला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रात्रीपासून विजय राजने जेवण, नाश्ता,चहा घेतला नाही.

असे आहे प्रकरण?

अभिनेत्री विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शेरनी’ या चित्रपटाचे शूटिंग गोंदिया शहरापासून जवळ असलेल्या मध्य प्रदेशातील बालाघाट येथे सुरू आहे. यासाठी चित्रपटाचा क्रू गोंदियातील हॉटेल गेटवेमध्ये गेल्या १५ दिवसांपासून मुक्कामास आहे. यामध्ये विनोदी अभिनेता विजय राज महत्त्वाची भूमिका साकारत आहे. यावेळी शूटिंगच्या क्रूमध्ये असलेल्या एका ३० वर्षीय महिलेची विजय राजने छेडछाड केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती. 

या महिलेने दिलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी कलम ३५४ (अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करून विजय राजला अटक केली होती. आज दुपारी २ वाजता त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणाविषयी पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. तसेच हॉटेल गेटवे प्रशासनाकडूनही सारवासारव करण्यात आली असून पत्रकारांनाही हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता.

Print Friendly, PDF & Email
Share